Skip to main content

भीमसेन - एक साठवण

प्रसंग पहिला
स्थळ - आहिल्यादेवी शाळेचा चौक - शनिवार पेठ, पुणे
साधारण काळ - १९५५ - ५८
एक मोठा चौक. तसा चौक म्हणजे नावाला. चार दिशेने चार रस्ते कसे बसे एका ठिकाणी आले होते म्हणून तो काय चौक. चौकातच मोठी मोठी वडाची झाडं. एक चार पाच वर्षांचा, लहानगा अर्धी चड्डी घातलेला मुलगा चौकातच गाण्याच्या कार्यक्रमासाठी घातलेल्या मोठ्या मांडवात बागडत होता. एकटाच होता खूषीत. त्याच चौकात तर त्याचं घर होतं. आज पंडीत भीमसेन जोशींचे शास्त्रीय संगीत होते ना. थोड्यावेळाने एक उंचपुरा, काळी टोपी घातलेला गायक रंगमंच्यावर येउन बसला. "हा भीमसेन हळूहळू फार गुणी गायक बनतोय. सवाईगंधर्वांचा शिष्य आहे तो! " - कुणीतरी कुजबुजलं. यथावकाश कार्यक्रम सुरु झाला. भीमसेन चा बुलंद आवाज ऐकून रसिक मंत्रमुग्ध व्हायला लागले. बराच वेळ खेळत असलेला लहानगा, भीमसेनजींचा द्रुत सुरु झाल्यावर त्यांच्या आक्रमक हावभावाला, वेगाने जाणार्‍या एखाद्या तानेसोबत एकदम पुढे वाकण्याच्या त्यांच्या सवयीला, गाण्याची छेडखानी करताना त्यांच्या चेहर्‍यावर उमट्लेल्या रेषांकडे पाहून गाल्यातल्या गालात हसत होता. त्याचीच तर त्याला मजा वाटत होती. त्याला कुठे काही गाणे समजत होते? कर्यक्रम संपला तेव्हा लोक म्हणाले, "मजा आला असं गाणं ऐकून!".

प्रसंग दुसरा
स्थळ - जुनी मंडई, बुधवार पेठ, पुणे
साधारण काळ - १९७० - ७२
रात्रीची वेळ. ८ वाजलेले. रस्त्यातच मध्यवर्ती ठिकाणी एक स्टेज बांधलेला. अखिल मंडई मंडळाचा सांस्क्रुतिक कार्यक्रम होता. साहजीकच श्रोत्यांमध्ये मंडईमधले व्यापारी, हमाल, कामगार वर्ग, पुण्याच्या मध्यवर्ती भागात आयोजीत केल्यामुळे आजूबाजूचा रहिवासी परीसर असा खर्‍याअर्थाने बहुजन समाज रस्त्यावर एकवट्लेला होता. रस्त्यावरच सर्वजण बसले होते. आता भीमसेनजींची वाट पाहत होते. कार्यक्रमाची वेळ केव्हाच उलटून गेली होती. मंडई मंडळाचे कार्यकर्ते मघाशीच लगबगीने जाताना दिसले होते. रात्रीचे साडे अकरा वाजले. शेवटी भीमसेन दिसले, त्यांना त्यांचा तोल नीट सावरता येत नव्हता. दोघांनी त्यांना धरले होते. मंचापर्यंत कसे तरी पोहोचवले आणि बैठक मांडली. पंधरा मिनिटातच त्यांनी पहिला अभंग छेडला - "कान्होबा तुझी घोंगडी चांगली." सगळेच उपस्थित शहारले. हळूहळू भक्तिरसात सगळे डोलू लागले. कार्यक्रम पहाटे साडेतीन ला संपला. पंडीतजींची प्रक्रुती नीट नव्हती असं उगाच वाटलं बहुतेक - एक २० - २२ वर्षांचा तरूण मनातल्या मनात म्हणाला.

प्रसंग तीसरा
स्थळ - सारसबाग ते स्वारगेट हा रस्ता, पुणे
साधारण काळ - बहुदा १९८० आसपासचा
पंडीतजीचा नावलौकीक खूपच वाढला होता. जगभरात त्यांचा श्रोत्रुवर्ग तयार झाला होता. सारबागे समोर महलक्ष्मीच्या मंदीराच्या उद्घाटन प्रसंगी पंडीतजींना निमंत्रित केले होते. प्रचंड जनसमुदाय उसळला. संयोजकांसमोर मोठी अड्चण उभी राहिली. स्वारगेट्चा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागणार. वेळीच शक्कल लढवून, संयोजकांनी गर्दीला नेहरू स्टेडियम मध्ये जायची घोषणा केली. पुर्ण मैदानात श्रोते आणि पॅव्हेलियनच्या मुख्य दर्शनी भागात भीमसेन, असा कार्यक्रम सुरु झाला - तिथे एक मध्यवयीन ग्रुहस्थ होता - त्यांने आयुष्यात पहिल्यांदा 'राम रंगी रंगले' हे भजन पहिल्यांदा त्याच वेळेस ऐकले. पुढे एकसेएक अभंग रंगले. लोकांना इतक्या वर्षात आता या कलाकाराची किंबहुना त्या कलेची जबरदस्त ओढ लागली होती.

प्रसंग चवथा
स्थळ - रमणबाग हायस्कूल, नारायण पेठ, पुणे
काळ - आठ- दहा वर्षांपूर्वीचा
कार्यक्रम सुरु होउन तासभर झाला असेल. पंडीतजींचे गाणे एव्हाना खुलले होते. तंबोर्‍यावर साथीला एक ज्येष्ट गायक होते. पंडीतजींच्या पेक्षा वीसेक वर्षांनीच लहान असतील. पंडीतजी ऐशीच्या घरातले होते तरी त्यांचा बुलंद आवाज स्टेजसमोर अगदी जवळ खाली बसलेल्या एका माणसाला खिळ्वून ठेवण्यास पुरुन उरेल असा होता. गात असलेल्या बंदिशीत, पंडीतजी पुन्हा मुखड्यावर आले आणि त्यानी एक हरकत घेतली. साथीच्या गायकाने तिच हरकत जरा घाबरत घाबरत घेतली. तशी सुरातच घेतली, पण अगदीच मुळ्मुळीत ऐकू आली. पंडीतजीनी पुन्हा तीच हरकत ताकदीनिशी घेतली, आणि हातवार्‍याने सुचवलं "असं गा!" त्याने पुन्हा प्रयत्न केला चढा आवाज येइना. नंतर तो इतका घाबरला की तीच हरकत घेण्याचा पुन्हा प्रयत्न भर महोत्सवात अर्धवट सोडला. भीमसेनचा आवाज माझ्या आत का पोहोचतो आणि इतरांचे का नाही, हे त्या पांढरट केस झालेल्या आणि आयुष्यात बर्‍याचदा भीमसेन ऐकलेल्या मनुष्यास त्या वेळी पहिल्यांदा समजले.

वरच्या सगळ्या प्रसंगात जो बालक, तरुण, मध्यवयीन ग्रुहस्थ आहे तो मला सोमवारी भेटला. हे प्रसंग त्यानेच सांगितले होते अधीमधी.
त्यांचही वय झालय आता. साठीत आहेत ते, पण द्र्ष्टी कमजोर झाली आहे आणि ऐकू यायचे प्रमाणही. ते म्हणाले, "आज भीमसेन जोशी गेल्याचे कळले, लोक म्हणतील 'सुटले' म्हणून. खूप आजारी होते ना, पण नाही. मला वाटलं की भारतीय संस्क्रुतीचा मानबिंदू हरपला. झालं ते वाईट झालं. खूप विचार केला आज. मी पुल देशपांडे, ग.दि. माडगूळ्कर, कुमार गंधर्व, सुधीर फडके असल्या दिग्गजांच्या उमेदीच्या काळात मी वाढलो आणि माझं आयुष्य घालवलं, भीमसेनजींचे तर किती गाणे ऐकलं - स्वतःला किती नशीबवान समजू!"

मी आधीच व्यथीत होतो म्हणालो - " त्यांच्या म्रुत्युमुळे संस्क्रुती संपली, आता पुढे काय कुणास ठाउक!".

तो ग्रुहस्थ मला म्हणाला, 'संस्क्रुती संपायला तो काही सर्वसाधारण माणूस नाहिये. तो माणूस शरीररुपी गेला पण स्वररुपी अमर आहे. त्यांचा आवाज सतत अजून कुणाला तरी कायम बळ देतच राहील. तो स्वरभास्कर आहे, भास्कर उगवण्यासाठीच मावळत असतो."

खूप रिकाम्या पोकळीने मी तिथून काढता पाय घेतला.

Comments

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च