Skip to main content

पुढचा जन्म

तो दिवस मांजरींचा होता.


दमून भागून आलो आणि घरच्या लग्नाची तयारी सुरु केली. बाहेर पडलो, एटीएम मधून पैसे काढले मोटार सायकल भरभाव सोडली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूने एक पांढर शुभ्र मांजर नेहेमीची सवय असल्या सारखे रस्ता ओलांडत बुंगाट सुटले. संध्याकाळची ७ ची वेळ. मुख्य रस्त्यावर भरपूर वाहतूक होती, तिथून कुणालाही न शिवता, माझ्या गाडीच्या पुढच्या चाकाच्या '३ मुंग्या' एवढे अंतर ठेवून ते मांजर सुखरूपपणे  पुढे गेले. क्षणभर वाटले कि तो पांढरा गोळा मी फुटबॉल  सारखा उडवला आणि ते गतप्राण झाले,  पण नशीब कि मी पहिल्या  पासून रस्ता  ओलांडण्याच्या  त्याचा पवित्रा पाहिला होता, आणि वेळीच ब्रेक लावला होता.  गाडी पूर्ण थांबली नाही तरी कमी  झालेल्या वेगामुळे  मांजरीचा जीव नक्की  बचावला होता. उसासा टाकून, पुन्हा गाडी दामटवायला सुरुवात केली. पुढच्याच चौकात एक नाही तो विचार आला. मागे बसलेल्या बहिणीला गम्मत  म्हणून  सांगितले, 'आता गाडी हळू चालवतो, मांजर आडवे आले ना!' :)  ती थोडीशी सिरीअसच झाली. 


त्या दिवशी एके ठिकाणी निमंत्रण द्यायचे होते, त्यांच्या गल्यात आमचे स्वागत दोन बोक्यानीच  एक सावध नजर टाकून आणि 'म्याव' करून  केले. "हि मांजरे शेजारयांची आहेत, इकडे येऊन बसतात." बहिणीने  माहिती  दिली. मी त्या बोक्यांना दुर्लक्ष केलं - तसे केल्याने मला खूप आनंद  मिळाला. यथावकाश निमंत्रण झाले, बघतो तर सोफ्या वर त्यांची मुलगी अभ्यास करत होती आणि तिच्या  उबेत अजून एक चट्टेरी काळे पांढरे मांजर डोळे मिटून बसले होते! एवढ्या आलिशान बंगल्यात पहुडलेले मांजर पाहून "काय नशीबवान जीव आहे!" असा हेवा वाटला.  


पुढे जायचं  होतं स्वयंपाक करणाऱ्या बाईंकडे. तिकडे गेलो आणि पाहतो तर डझनावर  मांजरी जिथे  तिथे पहुडल्या होत्या. सोफ्यावर बसायला जागा नाही म्हणून २ - ३  मांजरींना बखोटीला  धरून  उचलून  घरमालकांनी जवळच जमिनीवर फेकून दिलं आणि आम्हाला बसायला जागा केली. एवढ्या जास्त मांजरी एका  ठिकाणी   पाहून त्यांचे निरीक्षण करण्यातच जास्त वेळ गेला. गम्मत आली एकंदरीत. यथावकाश काम मार्गी लावून तिथून निघालो. 


बाहेरून ५ फळं आणायची होती. खरेदी आटोपली. तशी किरकोळ खरेदीच केली होती. 
"अडीचशे रुपये झाले" - फळवाला म्हणाला.
 मी म्हणलं  "काय? किती?" जरा धक्काच होता मला.
 "अडीचशे!" - तो पुन्हा थंडपणाने  म्हणाला. 


मुकाट्याने पैसे हवाली करून आणि अडीचशे रुपयात एवढीच फळे हे पाहून खिन्न मनाने परत निघालो. 
"कसलं महाग झाले आहे सगळं", लोकांनी फळे खाउच नये  अशी सरकारने सोय केली आहे." अशी निषेध संबोधक वाक्ये बहिण म्हणत होती. मीही बहिणीच्या वाक्यात वाक्य पेरलं. "देवा, पुढचा जन्म माणसाचा  नको देवूस बाबा"  समोरच पाचेक फूट अंतरावर अजून एक पांढरे शुभ्र मांजर रस्त्याच्या मध्यभागी  असलेल्या सायकलच्या मागे उभे राहून माझ्याकडेच पाहत होते. का  कुणास  ठाउक,  माझ्याही  तोंडात  अचानक आले - "मांजराचा दे पुढचा जन्म!" 


दूध,चक्का चोरायचा नाहीतर उंदीर किंवा पक्षी पकडायचे. पंचतंत्रा  मधली गोष्ट माहितीये त्यामुळे तराजू मधला खवा  मी दोघा माकडांना गंडवून  आरामात खाउ शकेन. सगळं आयतं मिळणार कशाचे काही बंधन नाही कि काही नाही. महागाईचे टेन्शन नाही, कुत्र्यासारखे घराची राखण करणे वगैरे गोष्टीची अपेक्षा कुणी करणार हि नाही. गुबगुबीत असल्याने पिल्लू असतानाच काय; म्हातारे झाल्यावरही लाड होणार. वाईट विचार नाहीये नै का!.


आजचा दिवस मांजरांचा होता, २ तासात जवळपास २५ एक मांजरी वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या होत्या. त्यामुले दुसरे काही सुचत नव्हते. पण आता काही दिवसांनीही देवाकडे पुढची मागणी कायम ठेवली आहे - पुढचा जन्म  मासे  खाणाऱ्या  कुटुंबातल्या पांढरयाशुभ्र बोक्याचा हवा - बाकी का s s s ही  नको. :)             

Comments

Anonymous said…
hahahaha. pudhcha janma manjaraachaach paayje. :)

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च