इतर खाद्य . .

Friday, 15 July 2011

बालगंधर्व


 
नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल.

नितिन देसाईक्रुत ’बालगंधर्व’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्वांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो.

त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगंधर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्वांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जागांवर हल्लीच्या  तरूण पोरांना दाद देताना पाहिलं की त्यांच्या गाण्यातील वैश्विक सौंदर्य स्पष्ट होतं. परवाच एका लहानग्यानी   स्वत: हार्मोनियमवर पंचतुंड नररुंड मालधर, ही गोविंदराव टेंब्यांची नांदी आवडीनं सादर केली, म्हणजे पुढच्या पिढीतही बालगंधर्व आलेच. हे अजून एक तसच उदाहरण.

वास्तविक, मराठी नाट्यस्रुष्टीचे हे अहोभाग्यच आहे की अशी नवनवोन्मेषशाली गायकी असलेली व्यक्ती ’गंधर्वयुग’ नावाचा मनोहारी काळ दाखवून गेली. पुष्कळ जुन्या लोकांकडून ऐकले आहे की किर्लोस्कर नाटक मंडळीची सुत्रे हाती घेतल्यावर, जो बदल घडून आला तो आपल्या भारतीय कलासंस्कृतीमधला सर्व जणांवरचा संस्कार होता. आचार्य अत्रे म्हणाले होते, की बालगंधर्वांचं नाटक पहायला लोक; आपल्या घरात काही शुभकार्य आहे अश्या भावनेने गर्दी करायचे. हे असे संस्कार त्यांनी त्यांच्या गाण्यातून लोकांवर केले.


’उत्कृष्ट’ म्हणजे काय आणि त्यात कसर कशी ठेवायची नाही? हे दाखवण्यासाठी नारायणरावांनी आयुष्य खर्च केलं. रंगमंच, नाट्यग्रुह सजावट यामध्ये सर्व दिशेने बहुतेकवेळा कर्जबाजारी असतानाही त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी काही कमी ठेवले नाही. रुक्मिणीला हे अत्तर चालणार नाही किंवा हे चालेल एवढा सुक्ष्म विचार ते करायचे. अत्र्यांनीच एका लेखात म्हंटले आहे की, प्रयोगापूर्वी ते चांगले ओंजळभर अत्तर लावत. त्यांचा हा आग्रह असे की पहील्या चार-पाच रांगांपर्यंत अत्तराचा सुगंध पोहोचला पाहिजे. याला सढळ हातानी देणे म्हणतात. एखाद्या गोष्टीमध्ये वाहून घेवून एक सर्वोत्तम उदाहरण म्हणूनच बनून रहायचे असा झपाटा असलेली ही एक वेडी व्यक्ती होती. उदाहरणादाखल पुलंनी सांगितलेला एक किस्सा. एकदा शंकरराव कुलकर्णी नाट्यमंचावरून पदं आवरून मंचामागे आल्यावर नारायणरावांनी त्यांना विचारले,

"इतक्यात आवरलं सुद्धा?"

त्यावर शंकरराव म्हणाले, "हो. आज पाच-आठच लोक होती. त्यामुळे शेवटची पदं लवकर आटोपली."

नारायणराव म्हणाले, "रंगमंचावर आल्यावर किती श्रोते नाहीत, याचा विचार करण्यापेक्षा किती श्रोते आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत अन त्यांना आपण प्रसन्न कसे करू शकतो याचा विचार करावा, आणि मग कला सादर करावी."

आपल्या पिढीचं दुर्भाग्य हे की ’बालगंधर्व’ आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले नाहीत, आपण त्या सौंदर्याचा आस्वाद घेवू शकलो नाही. ज्येष्ठांच्या सांगण्यानुसार अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते की बालगंधर्व श्रोतेजनांना सुरांच्या चांदण्यात, ऒर्गन, हार्मोनियमच्या साथीत अक्षरश: न्हाउ माखू घालत आहेत. तो झगमगाट, ते भरजरी ऐश्वर्य, परीपूर्ण सजावट, भरगच्च रंगमंच अश्या सगळ्यांमुळे श्रोते अगदी इंद्रनगरीमध्ये गेल्यासारखे दंग होउन जात आहेत.......... आपण फ़क्त कल्पनाच करू शकतो.

अच्युतराव कोल्हटकर, अत्रे यांच्या म्हणण्यानुसार नटवर्य भाऊराव कोल्हटकर, नटवर्य गोरे, शंकरराव कुलकर्णी आदी स्त्रीपार्टी कलाकार; नारायणरावांपेक्षा दिसण्याच्या बाबतीत जास्त आकर्षक होते, कदाचित असतीलही पण त्यांच्या अभिनयातील स्त्री-सुलभता ही कुणाकडेच नव्हती. मुलींच्या आया त्यांच्या मुलींना बालगंधर्वांचं उदाहरण देवून वळणं लावायच्या. याशिवाय अजून दुसरं बक्षीस काय पाहिजे? याशिवाय गाण्याबद्दल असलेली त्यांची श्रद्धा, वृत्ती, अभिनयाची धडाडी या सगळ्यांमध्येच वर लिहिलेल्यांपैकी कुणीही त्यांच्या जवळ जावू शकले नाहीत. ’देवा धरीले चरण’ हे भीमपलासी मधले पद किंवा ’नाथ हा माझा’ चा  यमन हे अंगागाला स्पर्ष करून जात असतील. मंत्रमुग्धतेचा अनुभव घ्यायला कोणाला आवडणार नाही? त्यांचे गुरु भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे अश्या थोर कलाकारांच्या चाली बालगंधर्व गाणार, म्हणजे त्या रंगमंचावर काय चमत्कार घडत असेल याचा मी फ़क्त विचार करू शकतो. चंद्रीका ही जणू, शूरा मी वंदीले, नरवर क्रुष्णासमान, नमन नटवरा किती सांगू! मध्ये एकदा सत्य वदे वचनाची कर्ण्यांची रेकार्ड ऐकण्याचा योग आला आणि पहील्याच फ़टक्यात मान डोलायला लागली. भारतामध्ये रेकॊर्डींगची सोय ते उतार वयात असताना आली. म्हणजे त्यांचा आवाज गेल्यानंतर त्यांनी अशी दर्जेदार गाणी गायली! ती दाद त्या गायकाच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती देणारी होती. त्या रेकॊर्डींग मधून ते गाणं जर इतकं सहज माझ्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रत्यक्षात ऐकणार्यांना स्वर्गातल्या कुठल्याश्या बगीच्यात चक्कर मारून आणल्याची अनुभूती मिळत असेल, याबद्दल मला शंका नाही. (रेकॊर्डींग येथे उपलब्ध आहे.)


बालगंधर्व चित्रपट आत्ता आला, पण फ़ार पूर्वी पुलंनी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा विचार अर्धवट सोडून दिला होता. ते म्हणाले होते की मी बाकी सगळं दाखवू शकेन, पण बालगंधर्वांचं गाणं कुठून दाखवू? तशी प्रतिभा कुठे मिळणार? माझी खात्री आहे की खुद्द बालगंधर्वांना सिनेमा मध्ये स्वर देणाऱ्या पं. आनंद भाटेंचं मत याहून वेगळं नसेल. मोठे मोठे कलाकार नारायणरावांच्या गाण्यापुढे कुर्निसात करत असत. बालगंधर्वांच्या गाण्यापुढे जयपूर घराण्याचे मातबर गायक उ. अल्लादियॊं खॊं साहेब विस्मयचकीत होउन तौबा करत असल्याचा किस्सा ऐकिवात आहे. छॊटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे) असे नाव लागताच दोन तासात संगीत मानापमान नाटकाची तिकिटविक्री संपत असे, पण ते खुद्द म्हणत असत बालगंधर्वांपर्यंत माझं गाणं कधीच जाउ शकणार नाही, तेवढी माझी पात्रताच नाही. आपले भीमण्णाही म्हणायचे बालगंधर्वांचं गाणं श्रेष्ठच. जागेची मर्यादा आहे, नाहितर अजून पुष्कळ स्तुतीसुमने उधळता येतील.

पुलंकडून कधीतरी ऐकलेला नारायणरावांच्या गायकीबद्दलचा किस्सा उदाहरणादाखल देता येइल. पुल, नारायणराव, हार्मोनियम संगत असे तीन चार कलाकार एका तमाशा कलावंताचा कार्यक्रमाचे श्रोते. कार्यक्रम तसा घरगुतीच असतो. तिची गवळण सादर करून झाल्यावर, नारायणरावांनी स्वत:हून तिला ठसक्यात गवळण, लावणी म्हणून दाखवत गुरुमंत्र दिले. त्यावेळेसचा गवळणीचा ठसका तसाच औरच होता असं पुलं म्हणतात. याला म्हणतात अवाका.

पुलंनी अजून एक अभ्यासलेली नारायणरावांची गोष्ट म्हणजे त्यांची विजिगिषू गायकी. गाण्याचा विषय, भाव, करत असलेली भूमिका, भावना या सगळ्याला लक्षात ठेवून मग पुढे गाण्यातील राग, चाल, ठेका एवढा सगळा विचार करून त्यांच्या गाण्यातील जागा बदलत असत आणि लोकांना जिंकत असत. उगाचच आक्रमक गावून लोकांच्या टाळ्या वसूल करण्याचा नारायणरावांचा स्वभाव नव्हता. अमुक एखाद्या प्रसंगात भामिनीचे स्वर कसे लागतील किंवा रुक्मिणीच्या भावना काय असतील याचे प्रात्यक्षिक नारायणराव सहजसुंदरपणे अभिनीत करायचे. ही त्यांची संगीत-अभिनय कलेवरची हातोटी होती. त्यांच्या गाण्यातील एक्सलन्स गाण्याच्या आधीच्या वाक्यापासून सुरु होत असे. गाण्याच्या आधीच्या वाक्याचा स्वर हा गाण्याच्या सुरुवातीच्या स्वराला टेकवला की गाण्यामध्ये आपोआप एकसंधता राहत असे. बालगंधर्वांच्याही वीस एक वर्ष पूर्वी असणारे गोविंदराव देवल यांच्याही असा अभ्यास करायला आवडेल पण, गाण्याचा तब्बल शंभर वर्षांपूर्वीच्या काळात एवढा विचार करणारा आणि अशी अंमलबजावणी करणारा बालगंधर्व    हा पहिलाच कलावंत असेल.

अच्युतराव कोल्हटकरांनी गंधर्वांवर ताशेरे ओढले होते. -

"नारायणराव, हे ३५००० रुपये पेढीत जमा करतो." 

"ठीक आहे, तेवढे अत्तराचे द्या, आणि उरलेले जमा करा."
 
"बरंय, किती झाले अत्तराचे?"
 
"३००००"
 
अश्या थाटमाटावरून केलेल्या ’अव्यवहारी’ पणा मुळे त्यांच्यावर खूप टिकास्त्र सोडली. भरजरी पोशाख, नाटक कंपूच्या कमालीच्या आरामदायी व्यवस्था, भव्यदिव्य रोषणाई, इतर अमर्यादीत खर्च यामुळेच त्यांची आर्थिक विवंचना कधीच संपली नाही. बोलपट हे दुसरे कारण मारकच होते. हे सगळं खरं असलं तरी नाटक आणि गायनी कळा रक्तात जपत असलेल्या या माणसाची मजल अशीच उत्तुंग होती. त्यांनी मोठी स्वप्न पाहीली, अन त्या दिशेने वाटचालही सुरु केली होती. हा झाला चांगला भाग. उत्तरार्ध हा दुर्दैवपूर्ण! पूर्वी राजदरबारतले गवई जमत असत ना, त्यांना खर्च, हिशोब, राहाण-सहाण याबाबत विशेष देणेघेणे नसे. नारायणराव हे त्यापैकीच असावे. नारायणरावांचे बालपणही संस्थानिकांमध्येच गेलं होतं, म्हणून एवढंच वाटतं की नारायणरावांचा जन्म जरा उशिरा झाला, म्हणजे व्यवहाराच्या कात्रीत त्यांची परिक्षा पाहीली गेली नसती.  राजाश्रय करणारे गवई आणि लोकाश्रयासाठी गाणारे (म्हणजे 'पब्लिक' साठी गाणारे) असे गवयांचे दोन प्रकार असतात. यांच्यापैकी पहिल्या वर्गात गेल्याने त्यांचे नुकसान झाले. तसा दुसरा वर्ग मुळातच अगदी तर्हेवाईक.

आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रपती पदक, पद्म्भूषण असे सन्मान मिळूनही त्यांची आर्थिक विवंचना काही संपली नाही.पुढे त्यांनी प्रभात कंपनीबरोबर काही बोलपटही केले, परंतु तिथे त्यांचं मन रमले नाही. तशातच सततच्या आजारपणानंतर त्यांना अपंगत्व आलं. एवढं कमी म्हणून की काय त्याच दरम्यान गौहार बाई नावाच्या एका यवन स्त्री बरोबर त्यांचं लग्न झालं. गौहारबाईच्या खातर त्यांनी धर्मांतर केले. जातीयवादाचे प्रचंड स्तोम असलेल्या त्या स्वातंत्रोत्तर काळात त्यांच्या म्रुत्यू पश्चात, त्यांच्यावर हिंदू पद्धतीने संस्कार करून झाल्यावर मगच त्यांचा म्रुत्यू जाहीर केला गेला.मुसलमान समाज त्यांचे दफ़न करणार होता. हा सगळा घटनाक्रम म्हणजे अजूनच दुर्दैव! शापित यक्ष असं म्हणायला सोप जात असलं तरी हे सगळं लिहिणं हाच एक गदगदून टाकणारा भाग आहे. अनुभवताना काय वाटत असेल हा विचार करून अंगावर काटा येतो.

स्वत: अमृताचा आस्वाद न घेता, त्याची मुक्तहस्ते उधळण करत त्यांनी आयुष्य घालवलं आणि आपल्या सर्वांच्या स्मृतीत अगदी तश्याच ऐश्वर्यात राहिले आहेत . . . आणि राहतील.

Thursday, 16 June 2011

सीबिस्किट



ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही.

भाग एक - हॊवर्ड

कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your life, just because its banged up a little." हॊवर्डचे डोळे उघडतात. तो स्मिथला त्याचा तबेल्याचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून ठेवतो.


रेड पोलार्ड, स्मिथ, हॊवर्ड


भाग दोन - सीबिस्किट 



सीबिस्कीटचे आई-बाबा दोघेही उमदे अश्व. सहा महिन्याचा असतानाच त्याच्या छोटेखानी आकारामुळे त्याचे प्रशिक्षक त्याची हकालपट्टी करतात. दुसरीकडेही त्याचे खूप कष्टप्रद प्रशिक्षण होत असते परन्तु हा सीबिस्किट सलग १० शर्यतीत शेवटचाच येतो. तो हळूही असतो आणि खूप खाणारा पण त्यामुळे दुसरा मालकही सीबिस्कीट्ला विकायला काढतो. हॊवर्ड त्याला नाममात्र किंमतीत विकत घेतो. सततचं ट्रेनिंग, कष्ट, कमी वेळात खूप जास्त शर्यती यामुळे सीबिस्किट चिडचिडा झालेला असतो. हॊवर्डजवळ काम करणार्या अनेक माणसांपैकी एक, बालपण श्रीमंतीत गेलेला परंतु आई-बापानी टाकून दिलेला ’पोलार्ड’ नावाचा इसम स्मिथला दिसतो. सीबिस्किट आणि पोलार्ड यांच्यात जाणवलेल्या स्वभावसाधर्म्यामुळे स्मिथ पोलार्ड्ची नेमणूक सीबिस्किट्च्या देखभालीवर करतो.


कुणाचं न ऐकणारा पिसाळलेला असा सीबिस्किट अश्व अखेरीस पोलार्डपुढे नमते घेतो. स्मिथची विचित्र प्रशिक्षण पद्धती तसेच रेड पोलार्ड (जॊकी)  अन तो यांच्यात असलेला समन्व्यय यांमुळे सीबिस्किट हळूहळू एक छोट्या चणीचा पण विशाल ह्रदय असलेला आणि तसेच शर्यती जिंकणारा दर्जेदार अश्व म्हणून स्थान पक्के करू लागतो. हा बदल पाहून प्रत्येक प्रेक्षकाला यावेळेस स्मिथने हॊवर्ड ला सांगितलेलं तेच वाक्य पुन्हा आठवतं आणि पटतं, "You dont throw away your life, just because its banged up a little."

भाग तीन - रेड पोलार्ड 



हळूहळू सीबिस्किट आणि जॊकी रेड पोलार्ड एकापाठोपाठ खूप शर्यती जिंकल्याने लोकप्रिय होत जातात.  एका मुख्य डर्बी मध्ये त्यांची ’अडमिरल वॊर’ नावाच्या एका अश्वाशी गाठ असते. सिबिस्किट  आणि रेड पोलार्ड या दोघांचीही ही खरी कसोटीच असते. ’अडमिरल वॊर’ हा एक मजबूत सलग १६ डर्बीज जिंकणारा तसेच ट्रिपल क्राउन विनर असा अश्व असतो.

शर्यत सुरु होते. शर्यतीत सगळं रेड नी ठरवल्याप्रमाणे होत असतं. रेस संपताना आपण खूप पुढे आहोत आणि सहज शर्यत जिंकू असे समजणारा रेड अखेरच्या क्षणी गाफ़ील राहिल्याने फ़ोटो फ़िनिश मध्ये हरतो. रेस नंतरच हॊवर्ड आणि स्मिथ या दोघांनाही कळते की रेड पोलार्ड एक डोळ्यांनी अंध आहे. अश्या एवढ्या फ़सवणुकीनंतरही हॊवर्ड रेड पोलार्डला नोकरीवरून काढून टाकत नाही. वर तो असे जाहीर करतो की सीबिस्किट आणि पोलार्ड हे पुन्हा अडमिरल वॊरशी खेळतील. त्यावेळी सर्रकन स्मिथचे तेच वाक्य पुन्हा आठवते, "You dont throw away your life, just because its banged up a little."


भाग ४ - सीबिस्किट आणि रेड पोलार्ड


सीबिस्किट आणि साहजिकच हॊवर्ड  अगदी थोडक्यात हरलेला असतो. त्याला माहित असतं की संधी मिळाल्यास पुन्हा अडमिरल वॊर ला नक्की हरवू शकू. बरेच मागे लागून शेवटी सीबिस्किट विरुद्ध अडमिरल वॊर अशी, घंटीने सुरु होणारी, पुर्ण एका फ़ेरीची, आणि अडमिरल वॊरच्याच अंगणात होणार अश्या शर्यतीची तारीख ठरते. विशिष्ट सरावपद्धतीनुसार स्मिथ; रेड आणि सीबिस्किट दोघांचीही तयारी करून घेतो, परंतु दुर्दैवाने रेड पोलार्डचा मोठा अपघात होतो आणि त्याचा पाय जायबंदी होतो. इस्पितळात तो म्हणतो माझ्यासाठी  नाही पण सीबिस्किटसाठी हि शर्यत रद्द करू नका. जॊर्ज वूल्फ़ नावाचा दुसरा जॊकी, रेड पोलार्ड ऐवजी हॊवर्ड पाचारण करतो.

पोलार्ड जोर्ज वूल्फ़ला सीबिस्किट्ची सगळी रहस्य सांगतो शिवाय तो म्हणतो, "शेवटच्या वळणावर सीबिस्किट जर पुढे असेल तरीही त्याला थोडं हळू कर, त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे त्याला नीट पाहूंदेत. ही नजर सीबिस्किटला एका वेगळ्या गिअर मध्ये घेवून जाईल. Its not in his feet, its in in his heart." शर्यतीत सीबिस्किट यावेळी अडमिरल वॊरला सोडत नाही, त्याचा दणदणीत विजय होतो. रेड पोलार्ड इस्पितळात या शर्यतीचे समलोचन ऐकत असतो, त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.

दुर्दैवानी नंतर लगेचच एका शर्यतीत वूल्फ़-सीबिस्किट अशी जोडी असताना सीबिस्किटचा पाय दुखावतो. तेव्हा स्पष्ट होतं की सीबिस्किट पुन्हा शर्यतीत धावू शकणार नाही. त्या अश्वाचा आता काहीच उपयोग राहिलेला नसतो, तरी हॊवर्ड सिबिस्किट्ला गोळी घालून ठार न मारता, उपचार घेत असणारा त्याचा जॊकी रेड पोलार्डकडे पाठवून देतो. रेड पोलार्ड आणि सीबिस्किट दोघेही लंगडत लंगडत एकमेकांची साथ देत असतात. मोकळ्या हवेत हिंडून, औषधोपचार करून, व्यायाम करून सीबिस्किटचे लंगडणे हळूहळू कमी होउ लागले असते.  अचानक सर्वांनाच खात्री वाटू लागते की कदाचित सीबिस्किट पुन्हा शर्यतीत पळू शकेल.




कालांतराने सीबिस्किट बराच तंदूरुस्त होतो. त्याचा जॊकी म्हणून रेड पोलार्ड हॊवर्डकडे खूप आग्रह करतो. पण रेड वरच्या प्रेमापोटी हॊवर्ड  वूल्फ़लाच बोलावतो. रेडची इच्छाशक्ती खूप बळावली असते पण दरम्यान खूप प्रयत्नांती रेड पोलार्ड आणि सीबिस्किट यांचीच जोडी शर्यतीत उतरते. यावेळेस धोका एवढाच असतो की सीबिस्किटची सगळी रहस्ये वूल्फ़ला चांगलीच ठावूक असतात. शर्यती दरम्यान सीबिस्किट नेहमीप्रमाणे त्याचा वेग कमी करतो, वूल्फ़ला हे माहीत असल्याने तो मुद्दाम मागेच राहतो, एवढे करूनही अखेरीस विजय सीबिस्किट  आणि रेडचाच होतो. सिनेमा संपताना रेडचं एक वाक्य आहे, "You know everybody thinks we found this broken down horse and fixed him; but we didn't, he fixed us, everyone of us . . . and I guess we kind of fixed each other too."

      

चित्रपटातील घटनांचे सहज सादरीकरण, प्रसंगांचे चित्रण यातून भावनांच्या मोठ्या लाटा तयार होउन धाडकन छातीवर आदळत राहतात.  सर्वच पात्रांचा अभिनय सुंदर आहे. सिनेमातील एकही सीन उगीच आहे असे कधीच वाटत नाही. चित्रपटातील घोड्यांचे चित्रण ही तर एक झंझावाती  कविताच! १९३० च्या आसपासचा काळ, त्यावेळच्या छोट्या छोट्या गोष्टी सुरेख. नेत्रसुखद म्हणजे चित्रीकरण. निसर्गचित्रण हे तर चित्रपट सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत एकदम चाबूक.   घोड्यांच्या  शर्यतीचे इतकं थरारक अन वास्तववादी चित्रण मी पहिल्यांदाच पाहिलं असेल. गलितगात्र न होता, जे काही आहे ते वापरून घ्या अन यशस्वी व्हा असा संदेश सिनेमा सतत बघताना मिळत राहतो..

ही एक सत्यघटना आहे. आज सीबिस्किट्चा पुतळा सॆंटा अनिता पार्क, अर्केडिया, कॆलिफ़ोर्निया येथे त्याची आठवण म्हणून आहे. असा हा प्रेरणा देणारा  सिनेमा. यामुळेच की काय बहुदा जास्त शब्द न सुचता, अख्खी कथाच इथे लिहिली गेली असेल. :)  पण तसे कच्चे दुवे वगैरे नाहीचेत मुळी. मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावा असा हा चित्रपट. कदाचित पाहिलाही असेल तुम्ही, पण नसेल पाहिलात तर नक्की पहा.


सीबिस्किट चे डीव्हीडी कव्हर