Skip to main content

बालगंधर्व


 
नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल.

नितिन देसाईक्रुत ’बालगंधर्व’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्वांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो.

त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगंधर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्वांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जागांवर हल्लीच्या  तरूण पोरांना दाद देताना पाहिलं की त्यांच्या गाण्यातील वैश्विक सौंदर्य स्पष्ट होतं. परवाच एका लहानग्यानी   स्वत: हार्मोनियमवर पंचतुंड नररुंड मालधर, ही गोविंदराव टेंब्यांची नांदी आवडीनं सादर केली, म्हणजे पुढच्या पिढीतही बालगंधर्व आलेच. हे अजून एक तसच उदाहरण.

वास्तविक, मराठी नाट्यस्रुष्टीचे हे अहोभाग्यच आहे की अशी नवनवोन्मेषशाली गायकी असलेली व्यक्ती ’गंधर्वयुग’ नावाचा मनोहारी काळ दाखवून गेली. पुष्कळ जुन्या लोकांकडून ऐकले आहे की किर्लोस्कर नाटक मंडळीची सुत्रे हाती घेतल्यावर, जो बदल घडून आला तो आपल्या भारतीय कलासंस्कृतीमधला सर्व जणांवरचा संस्कार होता. आचार्य अत्रे म्हणाले होते, की बालगंधर्वांचं नाटक पहायला लोक; आपल्या घरात काही शुभकार्य आहे अश्या भावनेने गर्दी करायचे. हे असे संस्कार त्यांनी त्यांच्या गाण्यातून लोकांवर केले.


’उत्कृष्ट’ म्हणजे काय आणि त्यात कसर कशी ठेवायची नाही? हे दाखवण्यासाठी नारायणरावांनी आयुष्य खर्च केलं. रंगमंच, नाट्यग्रुह सजावट यामध्ये सर्व दिशेने बहुतेकवेळा कर्जबाजारी असतानाही त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी काही कमी ठेवले नाही. रुक्मिणीला हे अत्तर चालणार नाही किंवा हे चालेल एवढा सुक्ष्म विचार ते करायचे. अत्र्यांनीच एका लेखात म्हंटले आहे की, प्रयोगापूर्वी ते चांगले ओंजळभर अत्तर लावत. त्यांचा हा आग्रह असे की पहील्या चार-पाच रांगांपर्यंत अत्तराचा सुगंध पोहोचला पाहिजे. याला सढळ हातानी देणे म्हणतात. एखाद्या गोष्टीमध्ये वाहून घेवून एक सर्वोत्तम उदाहरण म्हणूनच बनून रहायचे असा झपाटा असलेली ही एक वेडी व्यक्ती होती. उदाहरणादाखल पुलंनी सांगितलेला एक किस्सा. एकदा शंकरराव कुलकर्णी नाट्यमंचावरून पदं आवरून मंचामागे आल्यावर नारायणरावांनी त्यांना विचारले,

"इतक्यात आवरलं सुद्धा?"

त्यावर शंकरराव म्हणाले, "हो. आज पाच-आठच लोक होती. त्यामुळे शेवटची पदं लवकर आटोपली."

नारायणराव म्हणाले, "रंगमंचावर आल्यावर किती श्रोते नाहीत, याचा विचार करण्यापेक्षा किती श्रोते आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत अन त्यांना आपण प्रसन्न कसे करू शकतो याचा विचार करावा, आणि मग कला सादर करावी."

आपल्या पिढीचं दुर्भाग्य हे की ’बालगंधर्व’ आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले नाहीत, आपण त्या सौंदर्याचा आस्वाद घेवू शकलो नाही. ज्येष्ठांच्या सांगण्यानुसार अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते की बालगंधर्व श्रोतेजनांना सुरांच्या चांदण्यात, ऒर्गन, हार्मोनियमच्या साथीत अक्षरश: न्हाउ माखू घालत आहेत. तो झगमगाट, ते भरजरी ऐश्वर्य, परीपूर्ण सजावट, भरगच्च रंगमंच अश्या सगळ्यांमुळे श्रोते अगदी इंद्रनगरीमध्ये गेल्यासारखे दंग होउन जात आहेत.......... आपण फ़क्त कल्पनाच करू शकतो.

अच्युतराव कोल्हटकर, अत्रे यांच्या म्हणण्यानुसार नटवर्य भाऊराव कोल्हटकर, नटवर्य गोरे, शंकरराव कुलकर्णी आदी स्त्रीपार्टी कलाकार; नारायणरावांपेक्षा दिसण्याच्या बाबतीत जास्त आकर्षक होते, कदाचित असतीलही पण त्यांच्या अभिनयातील स्त्री-सुलभता ही कुणाकडेच नव्हती. मुलींच्या आया त्यांच्या मुलींना बालगंधर्वांचं उदाहरण देवून वळणं लावायच्या. याशिवाय अजून दुसरं बक्षीस काय पाहिजे? याशिवाय गाण्याबद्दल असलेली त्यांची श्रद्धा, वृत्ती, अभिनयाची धडाडी या सगळ्यांमध्येच वर लिहिलेल्यांपैकी कुणीही त्यांच्या जवळ जावू शकले नाहीत. ’देवा धरीले चरण’ हे भीमपलासी मधले पद किंवा ’नाथ हा माझा’ चा  यमन हे अंगागाला स्पर्ष करून जात असतील. मंत्रमुग्धतेचा अनुभव घ्यायला कोणाला आवडणार नाही? त्यांचे गुरु भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे अश्या थोर कलाकारांच्या चाली बालगंधर्व गाणार, म्हणजे त्या रंगमंचावर काय चमत्कार घडत असेल याचा मी फ़क्त विचार करू शकतो. चंद्रीका ही जणू, शूरा मी वंदीले, नरवर क्रुष्णासमान, नमन नटवरा किती सांगू! मध्ये एकदा सत्य वदे वचनाची कर्ण्यांची रेकार्ड ऐकण्याचा योग आला आणि पहील्याच फ़टक्यात मान डोलायला लागली. भारतामध्ये रेकॊर्डींगची सोय ते उतार वयात असताना आली. म्हणजे त्यांचा आवाज गेल्यानंतर त्यांनी अशी दर्जेदार गाणी गायली! ती दाद त्या गायकाच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती देणारी होती. त्या रेकॊर्डींग मधून ते गाणं जर इतकं सहज माझ्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रत्यक्षात ऐकणार्यांना स्वर्गातल्या कुठल्याश्या बगीच्यात चक्कर मारून आणल्याची अनुभूती मिळत असेल, याबद्दल मला शंका नाही. (रेकॊर्डींग येथे उपलब्ध आहे.)


बालगंधर्व चित्रपट आत्ता आला, पण फ़ार पूर्वी पुलंनी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा विचार अर्धवट सोडून दिला होता. ते म्हणाले होते की मी बाकी सगळं दाखवू शकेन, पण बालगंधर्वांचं गाणं कुठून दाखवू? तशी प्रतिभा कुठे मिळणार? माझी खात्री आहे की खुद्द बालगंधर्वांना सिनेमा मध्ये स्वर देणाऱ्या पं. आनंद भाटेंचं मत याहून वेगळं नसेल. मोठे मोठे कलाकार नारायणरावांच्या गाण्यापुढे कुर्निसात करत असत. बालगंधर्वांच्या गाण्यापुढे जयपूर घराण्याचे मातबर गायक उ. अल्लादियॊं खॊं साहेब विस्मयचकीत होउन तौबा करत असल्याचा किस्सा ऐकिवात आहे. छॊटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे) असे नाव लागताच दोन तासात संगीत मानापमान नाटकाची तिकिटविक्री संपत असे, पण ते खुद्द म्हणत असत बालगंधर्वांपर्यंत माझं गाणं कधीच जाउ शकणार नाही, तेवढी माझी पात्रताच नाही. आपले भीमण्णाही म्हणायचे बालगंधर्वांचं गाणं श्रेष्ठच. जागेची मर्यादा आहे, नाहितर अजून पुष्कळ स्तुतीसुमने उधळता येतील.

पुलंकडून कधीतरी ऐकलेला नारायणरावांच्या गायकीबद्दलचा किस्सा उदाहरणादाखल देता येइल. पुल, नारायणराव, हार्मोनियम संगत असे तीन चार कलाकार एका तमाशा कलावंताचा कार्यक्रमाचे श्रोते. कार्यक्रम तसा घरगुतीच असतो. तिची गवळण सादर करून झाल्यावर, नारायणरावांनी स्वत:हून तिला ठसक्यात गवळण, लावणी म्हणून दाखवत गुरुमंत्र दिले. त्यावेळेसचा गवळणीचा ठसका तसाच औरच होता असं पुलं म्हणतात. याला म्हणतात अवाका.

पुलंनी अजून एक अभ्यासलेली नारायणरावांची गोष्ट म्हणजे त्यांची विजिगिषू गायकी. गाण्याचा विषय, भाव, करत असलेली भूमिका, भावना या सगळ्याला लक्षात ठेवून मग पुढे गाण्यातील राग, चाल, ठेका एवढा सगळा विचार करून त्यांच्या गाण्यातील जागा बदलत असत आणि लोकांना जिंकत असत. उगाचच आक्रमक गावून लोकांच्या टाळ्या वसूल करण्याचा नारायणरावांचा स्वभाव नव्हता. अमुक एखाद्या प्रसंगात भामिनीचे स्वर कसे लागतील किंवा रुक्मिणीच्या भावना काय असतील याचे प्रात्यक्षिक नारायणराव सहजसुंदरपणे अभिनीत करायचे. ही त्यांची संगीत-अभिनय कलेवरची हातोटी होती. त्यांच्या गाण्यातील एक्सलन्स गाण्याच्या आधीच्या वाक्यापासून सुरु होत असे. गाण्याच्या आधीच्या वाक्याचा स्वर हा गाण्याच्या सुरुवातीच्या स्वराला टेकवला की गाण्यामध्ये आपोआप एकसंधता राहत असे. बालगंधर्वांच्याही वीस एक वर्ष पूर्वी असणारे गोविंदराव देवल यांच्याही असा अभ्यास करायला आवडेल पण, गाण्याचा तब्बल शंभर वर्षांपूर्वीच्या काळात एवढा विचार करणारा आणि अशी अंमलबजावणी करणारा बालगंधर्व    हा पहिलाच कलावंत असेल.

अच्युतराव कोल्हटकरांनी गंधर्वांवर ताशेरे ओढले होते. -

"नारायणराव, हे ३५००० रुपये पेढीत जमा करतो." 

"ठीक आहे, तेवढे अत्तराचे द्या, आणि उरलेले जमा करा."
 
"बरंय, किती झाले अत्तराचे?"
 
"३००००"
 
अश्या थाटमाटावरून केलेल्या ’अव्यवहारी’ पणा मुळे त्यांच्यावर खूप टिकास्त्र सोडली. भरजरी पोशाख, नाटक कंपूच्या कमालीच्या आरामदायी व्यवस्था, भव्यदिव्य रोषणाई, इतर अमर्यादीत खर्च यामुळेच त्यांची आर्थिक विवंचना कधीच संपली नाही. बोलपट हे दुसरे कारण मारकच होते. हे सगळं खरं असलं तरी नाटक आणि गायनी कळा रक्तात जपत असलेल्या या माणसाची मजल अशीच उत्तुंग होती. त्यांनी मोठी स्वप्न पाहीली, अन त्या दिशेने वाटचालही सुरु केली होती. हा झाला चांगला भाग. उत्तरार्ध हा दुर्दैवपूर्ण! पूर्वी राजदरबारतले गवई जमत असत ना, त्यांना खर्च, हिशोब, राहाण-सहाण याबाबत विशेष देणेघेणे नसे. नारायणराव हे त्यापैकीच असावे. नारायणरावांचे बालपणही संस्थानिकांमध्येच गेलं होतं, म्हणून एवढंच वाटतं की नारायणरावांचा जन्म जरा उशिरा झाला, म्हणजे व्यवहाराच्या कात्रीत त्यांची परिक्षा पाहीली गेली नसती.  राजाश्रय करणारे गवई आणि लोकाश्रयासाठी गाणारे (म्हणजे 'पब्लिक' साठी गाणारे) असे गवयांचे दोन प्रकार असतात. यांच्यापैकी पहिल्या वर्गात गेल्याने त्यांचे नुकसान झाले. तसा दुसरा वर्ग मुळातच अगदी तर्हेवाईक.

आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रपती पदक, पद्म्भूषण असे सन्मान मिळूनही त्यांची आर्थिक विवंचना काही संपली नाही.पुढे त्यांनी प्रभात कंपनीबरोबर काही बोलपटही केले, परंतु तिथे त्यांचं मन रमले नाही. तशातच सततच्या आजारपणानंतर त्यांना अपंगत्व आलं. एवढं कमी म्हणून की काय त्याच दरम्यान गौहार बाई नावाच्या एका यवन स्त्री बरोबर त्यांचं लग्न झालं. गौहारबाईच्या खातर त्यांनी धर्मांतर केले. जातीयवादाचे प्रचंड स्तोम असलेल्या त्या स्वातंत्रोत्तर काळात त्यांच्या म्रुत्यू पश्चात, त्यांच्यावर हिंदू पद्धतीने संस्कार करून झाल्यावर मगच त्यांचा म्रुत्यू जाहीर केला गेला.मुसलमान समाज त्यांचे दफ़न करणार होता. हा सगळा घटनाक्रम म्हणजे अजूनच दुर्दैव! शापित यक्ष असं म्हणायला सोप जात असलं तरी हे सगळं लिहिणं हाच एक गदगदून टाकणारा भाग आहे. अनुभवताना काय वाटत असेल हा विचार करून अंगावर काटा येतो.

स्वत: अमृताचा आस्वाद न घेता, त्याची मुक्तहस्ते उधळण करत त्यांनी आयुष्य घालवलं आणि आपल्या सर्वांच्या स्मृतीत अगदी तश्याच ऐश्वर्यात राहिले आहेत . . . आणि राहतील.

Comments

Jayani said…
arjun tuze blogs khup wachaniya aahet....aawadle... :)
छान लिहिलं आहेस...
पूर्वी म्हणे त्यांची सहकलाकारांबरोबर पैज लागायची
बालगंधर्व स्त्री वेशात हळदी कुंकवाला जाऊन यायचे आणि स्त्रिया सुद्धा ओळखू शकायच्या नाहीत की ही स्त्री नाही.....
बऱ्याच लोकांना त्यांना अव्यवहारी वगैरे म्हणताना ऐकलं... पण कलाकार लोक खरंच असेच असतात. कशाचाही विचार न करता फक्त कलेला वाहून घेणारे....
Unknown said…
आज जावून वेळ भेटला वाचायला, प्राची हो बालगंधर्वांची जी अदा होती त्या अदेला बायकासुद्धा भाळायच्या मग पुरुषांचे काय! आणि हो तो काल होताच तसा खरोखर पुजारी होते ते कलेचे परमेश्वराने दिलेला आयुष्य वाया न घालवता त्याच कष्टरूपी चीज करायचाच हा पणच असायचा.... बाकी अर्जुन अप्रतिम खूप खूप मस्त

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च