Skip to main content

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे. नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल-भक्षण करणारे सूर-असुर सापडतील. आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की. यावरून आठवलं, लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे. तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात. आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला, पण मुखातला विडा परत काढावाच कशाला? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे. मराठी व्याकरणातही सुपारी देणे, विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की. दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे. त्यात म्हंटले आहे की,

कीर्तनी तांबूल भक्षण तें रजस्वलेचें शोणित जाण कागजन्म तयालागून करी भक्षण नरक मांस.

त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक-संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून चुकावे. अर्थातच पहिले पान कुणी 'लावले' किंवा पान खायची पद्धत भारतात कधी पासून सुरु झाली हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. वास्तविक यावर कदाचित संशोधन झालेही असेल, पण सुज्ञांनी  यात पडलेलेच बरे. ( नै, 'रस' काढून टाकून चोथा का चावत राहायचा?) आग्रहाने सांगायचंच झालं तर आपल्या तमाम वेद-पुराणात, आयुर्वेदात, आणि इतर योगशास्त्रात पानाचा उल्लेख कायमच येत राहिलेला आहे. पान हे मुखशुद्धीकारक, मुखाची दुर्गंधी नाहीसे करणारे, कफ आणि कृमी नाशक आणि इतरही भरपुर चांगले गुण वगैरे असणारे व्यंजन आहे. फार प्राचीन काळपासून असलेला त्रयोदशगुण विडा हा आपल्या ऐकीवात असेलच की. भारतात कामशास्त्राबद्दलच्या ग्रंथात किंवा कामोद्दिपक काव्ये वगैरे असलेल्या साहित्यामध्ये पानाचा किती गोडवा गायला गेला आहे किंबहुना अजूनही गायला जात आहे हे सांगणे लगे (ऐका - कळीदाSS  कपूरी पान. . .; पान खाये सय्या हमारो. .  आणि अजून कितीतरी ). आमच्या एका आज्जीला त्रयोदशगुणी विडा किंवा गोविंदविड्या सारखेच 'पलंगतोड' अश्या भन्नाट नावाच्या विड्याची साहित्य आणि कृती माहिती होती. (माझे लग्न अजून झाले नाही त्यामुळे ते खायची संधी मला मिळाली नाही, असो

भौगोलिक दृष्ट्या सांगायचे झाले, तर पूर्ण जगात आपण भारतीयच हे पान खाणारे नशीबवान आहोत, (तसं म्हंटल तर फक्त उत्तर ते मध्य भारतीय तसंच थोडेफ़ार पाकिस्तान बाकी कुणी नाही) यात पाहिलं तर, बंगाल्यांनी देसी मोहोबा ही आवडती पानाची जात दिली. मघई, जगन्नाथ अश्या जाती मात्र उत्तर प्रदेशानीच दिल्या." यात फार खोलात जात नाही.

आता एवढी जुनी असलेली ही खरं सांगायचं तर एक कलाच. किंबहुना जुनी असल्यामुळेच की काय, ती  अतिपरीचयाची झाली आणि हल्लीच्या समाजात त्याची अशी अवज्ञा होउ लागली. हल्लीच्या जगात पानाची जागाव्यसनम्हणून संबोधली जाउ लागली आहे. वास्तविक उर्दू मध्ये आप पान का शौक रखते है?’ असे किती सम्यक आणि अदबशीर शब्दात बोलले जायचं. पुर्वी पान खाणारयाला आणि बनवणार्याला देखील काय प्रतिष्ठा होती. पण आता मात्र थुंककणार्यांची अवहेलनाच होऊ लागली आहे. आता फ़क्त एक पानवालाच आहे की जो थुंकणार्याने त्याच्या दुकानापुढे टाकलेल्या सड्याने क्रुतक्रुत्य होतो. बाकी कुणीच नाही उरलं. हेही असो.

या पानवाल्याला अजूनही काही पैलू आहेत का? माझ्यामते पानलावणे आणिपान बनवणे यातला फरक जो जाणतो तो खरा पानवाला. 'पान लाव' किंवा 'पान लगाव'' असं सांगून त्या पानवाल्यापुढे पानाबद्दल बड्बड करत, नाहितर अगदी समाधिस्त उभा राहणारा असा रुजलेला पान खाणारा; अन हे ऐकताच त्याच्या वाक्यात वाक्य पेरता पेरता जो पानवाला उत्साहाने ओल्या कापडाच्या खालून हिरवेगार पान काढून आणि झटकून स्वत:ची चित्रकला सुरु करतो तो खरा मुरलेला  पानवाला  असतो. अश्या पानवाल्याला विड्या, सिगारेटी, गुटखे विकण्यात रामच वाटत नाही. अश्या गिर्हाइकांना हा अगदी स्थितप्रज्ञासारखी  विडी, सिगारेट जे काही असेल ते काढून देतो. मात्र एक साधा फ़ुलचंद लगाव असं सांगितल्यास अचानक त्याच्या मध्ये जो उत्साह संचारतो ना तो विडी, गुटखा मागितल्यामुळे कधीच सळसळत नाही.

पान बनवणं म्हणजे चुना, कात, खुशबू, सौंफ, सुपारी इथेच थांबत नाही. प्रत्येक गिऱ्हाईकाचे खायचे दात वेगवेगळे असतात. पान हा एक धर्मच असतो असं म्हणा ना. एकदा का त्या जुळलेल्या चवीच्या पानाच्या धर्मात प्रवेश केला की, पुन्हा धर्मांतर करणे तसे अवघडच. म्हणजे फ़ुलचंद रिमझिम कच्ची बारिक सुपारी खाणार्याला एकदम फ़ुलचंद डबल किवाम दिलं तर ते पान खाताच थुंकुन देतील. (हो हेच ते फ़ुलचंद जे बेसावधपणे दिले गेल्याने खूप किस्से प्रसिद्ध झाले आहेत, कदाचित तुमच्याही बाबतीत ते घडले असतील) एकवेळ चवीचे सोडा, पानवाले बदलले आणि त्यांनी नवीन ठिकाणी दुकान टाकले तरी केवळ त्याच्या हाताचेच पान पाहीजे म्हणून २०-२० किलोमीटर प्रवास करत येणारे लोक आहेत. पान रसिकतेने खाणार्याला यातली व्यथा कळणार नाही!

कलकत्ता, बनारस, देसी, पूना, झंडा, फाफडा, गुंडा की पट्टी अश्या पानाच्या विविध जातीवरून आणि समोर आलेल्या गिर्हाइकाडे बघुन लगेचच अश्या पानवाल्यांची, पानाच्या आतल्या साहित्याची बेरीज वजाबाकी सुरु होते. हे पानवाले म्हणजे साक्षात भगवंताचे दुसरे रूपच असतात. इतक्या लोकांची पाने लक्षात ठेवणं म्हणजे काही सोप्पं काम नाही. कोणाला कात अगदी कमी, चुना जास्त लागतो, कोणाला काळी केशरी लागते, तर कोणाला लाल, कोण म्हणतो किवाम जादा डालो, एखादा सांगतो सुपारी शेकलेली किंवा भाजलेली टाक, एखादा भिजवलेली सुपारी खातो तर एखाद्याला कच्ची सुपारी 'पसंद' असते, एखादा नवीन नवीन पान खाणारा असतो तो म्हणतो मला पायनापल चटणी टाक. एक पान लाख भानगडी. पानवाल्यांची कधीही लक्षात येत नाही अशी एसोपी सुद्धा असते. एकाच वेळेस एकशेवीस तीनशे, किवाम, राम प्यारी आणि मसाला अशी पाने लावायची वेळ आली की लगेच त्याच्या डोक्यात बिना तंबाखू ते चढ्या मार्गाने एकशेवीस पर्यंत अश्याच क्रमाने पाने लावतो. बोटामुळे तंबाखू ज्या त्या पानातच जावी म्हणून ही काळजी घेतलेली असते. पण ह्या सगळया मागण्यांना डगमगता एखाद्या सिद्धिविनायकासारखा स्वत:च्या कलाकारी मध्ये मग्न होत हा लोकांच्या मागण्या पुर्ण करत असतो

'आपको कौनसा पान लागाउ?' असा प्रश्न विचारणे अश्या जातिवंत पानवाल्यांना आणि तसेच पान खाणार्याना पटत नाही. मला कुणी असं विचारलं तर माझी नाचक्की झाली एवढा अपमान वाटतो. असंच एकदा मित्र त्याची बायको आणि मी असे पान खायला गेलो असताना हाच प्रश्न त्या पानवाल्याने नेहमी येणार्या त्या मित्राला विचारला होता. त्या वेळेस 'माफ करो साहब पर मुझे लगा आपकी बिवी खडी हे इसलिये ऐसा पूछां' असे सांगितल्यावर मग कुठे मित्राचा पारा थंड झाला.

रसशास्त्रात पान खाण्याबद्दल काही लिहिलंय की नाही माहित नाही पण प्रत्येक ठिकाणी असतात तसे काही अलिखित नियम इथेही आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पिठल्या बरोबर भाकरी आणि हिरव्या मिर्चीचा खर्डा मिळाला तर आनंद द्विगुणीत होतो, पण पिठल्यावर तूप, अन बरोबर पुर्या एकत्र दिल्या तर खाणार्याचे तोंड बघण्यासारखे होईल श्रीखंडाबरोबर बाजरीची भाकरी दिली तर ती खाववेल का? श्रीखंडाची मजा ही पुरी बरोबरच वाढते आणि तूपाची धार गरमागरम पुरणपोळीवर किंवा वरण भाताच्या मुदीवर पडलेली बघून जे समाधान असते ना तसेच काही अलिखित नियम पानाच्या बाबतीत आहेत. जातिवंत पान खाणारा हे जाणतो. पान, चुना, कात, खुशबू, केसरी चटणी,किवाम, रिमझिम, इलायची, सुपारी असा खानसामा बाज असलेल्या पानात अचानक गुलकंद टाकले आणि त्याला गोड केले की सगळेच बिघडले समजा. असं पान बनवणारा पानवालाही वैतागून त्रासिक चेहरा करतो. पायनापल किंवा गोड खसची चटणी देखील काही जण अश्या पानात टाकून खातात. खुशबू जादा डालो अशी फ़र्माइश करून पुन्हा त्यात एकशे वीस, बत्तीस अशी तंबाखू खाणारे पानकरीही विचित्र या रकान्यात मोडतात. नाही शास्त्रच नाही मुळीतंबाखूची नशा येते म्हणून काही महाभाग स्वत:च्या पानात ती जास्तीत जास्त टाकायला सांगतात, पण भेळेमध्ये चिंचेचे पाणी एक चटपटीतपणा आणते म्हणून ते कुणी जास्त खात नाही. भेळेतल्या प्रत्येक गोष्टी प्रमाणात झाल्या तरच जशी मजा येते, तसच पानाचे आहे. पण हे जाणणारा तो खरा खाणारा. चवीपेक्षा दोन पाउले पुढे जाउन, जो शौक म्हणून खातो ती खरी गम्मत. खरा शौकीन कसा असतो तर नवरतनच्या ऐवजी राजरतन है? अशी आवर्जून प्रुच्छा करणारा तोच तो.

भय्ये लोकांच्या पान खायच्या सवयी या जगात कुठेही नाही. खरे पान म्हणजे असं मोठं झिरझिरीत हिरवंगार देठ कापलेले पान, त्यात भरपूर चुना फ़ासलेला, कात, बारिकशी खुशबू पावडर, कुठल्याही प्रकारची तंबाखू, कच्च्या सुपारी चे - खडे एवढंच साधे सरळ. शिवाय हे खाल्यावर बोटावर थोडासा चुना अजून मागणार आणि जिभेला श्रीखंड चाटवल्यासारखे चिटकवणार. जातिवंत पानवाला या बाबतीत स्वच्छतेचा सगळ्यात मोठा पुजारक असतो. चुन्याच्या भांड्यात गिर्हाइकाने बोट घातलेले त्याला अजिबात पटत नाही. त्यामुळे त्याच्या ओट्यावर आजूबाजूला चुना काढून ठेवण्याच्या वाळलेल्या जागा दिसतातच. जुन्या गिर्हाइकाने चुना मागितला की, त्याच जागेवर चुना लावणार आणि गिर्हाइकही अदबीने तिथून चुना उचलणार. सच्छतेबद्दल अजून एक खपणारी पानवाल्याची गोष्ट म्हणजे त्याची ती चकचकीत पितळी भांडी, लोटे, आणि परात. या सगळ्या गोष्टी चमचम करत नसतील, तर पानवाला स्वत:ला फ़ाउल ठरवत असेल. रोज सकाळ संध्याकाळ ती भांडी साफ़ होणारच हा कटाक्ष तो पाळतो. परंतु त्याचवेळेस  स्वत:चा वेश मात्र इतका कळकट का करून घेतो हे मला सुटलेले कोडे आहे. किंबहुना अतिशय स्वछ पानवाला दिसला तर तोंडाचा रंग जमत नाही अशी काहीतरी अलिखित भिती वगैरे असेल. पण पानवाला आणि पांढरे शुभ्र, स्वच्छ कपडे घातलेला .. छे कल्पनाच सहन होत नाही. हा त्यावरून आठवलं, गिर्हाईकासाठी म्हणून एक फ़डकं टांगलेले असते, त्या फ़डक्याचा मूळ रंग काय असा प्रश्न मी एकदा पानवाल्याला खेचता खेचता म्हणून विचारला होता. कळकटपणाबद्दल आपण किती बोलायचे! काही गोष्टींवर डाग छान दिसतात त्यातला हा एक, हेच खरं.

एकदा हैदराबादला जायचा  योग होता, तिथे मला पानाची शौकआणि सवयबाबतची व्याख्या पटली. लहानग्या मुलांना चुना, कात, अन कडुनिंबाचे छोटे तुकडे घालून खायला देतात. ती ही आवडीने खातात. काहींच्या घरी विड्याची पाने असतात. आपआपले पान आपण बनवून म्हणजे चुना, कात, लवंग एवढे लावून खायचे अशी पद्धत आहे. हे सगळं पाहून अचंबा वाटला, आणि पानाबद्दलचे विचार अजून जास्त खुले झाले.

तर असे हे पान. पान खाण्यासाठी मी काही प्रव्रुत्त करण्याचा माझा उद्देष अजिबात नाही. व्यसन या थरावर  गेलेली कुठलीही गोष्ट वाईटच. पण त्याचा सर्वांगी विचार करून शौक करणे हा मजाकाही औरच हेही तितकेच खरे.

चला तर मग एकेक पान होउन जाउंदे! :)

Comments

पानाचं महात्म्य उत्तम कथन केलं आहेस.... मला लहानपणी सांगण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी पान खाऊ नये (लहान वयात असा उद्देश होता)... पण त्यामुळे मी अजूनही पान खाल्लं नाहीये... :(
मीसुद्धा इंद्रु... :)
पु.ल. देशपांडे यांचा पान आणि पानवाला यावर एक खूप अप्रतीम लेख आहे...त्याची आठवण झाली...
आता या अर्जुन देशपांडेंनी त्यात भर घातली....
जवळपास हे सगळेच मुद्दे पु.लंच्या लेखात पण समाविष्ट आहेतच.....
अर्जुना खूप छान ....
.....
मस्त पान कात चुना आणि सुपारी असे साधे पान एखाद्या वयस्कर माणसाकडून करून घेवून खाण्यात जी मज्जा आहे ती पानवाल्याकडे नक्कीच नाही......
Unknown said…
@ इंद्रधनू - खूप धन्यवाद.

अरेरे, शाळेत सांगतात कारण त्यानाही माहीत असते, आपण सांगो अथवा ना सांगो मुलं त्यांना करायचे आहे ते करणारच. तुझ्या सारखी गुणी मुलं फार थोडी असतात. :)
पण संधी मिळाल्यास एकदा तोंड लाल जरूर कर! :)
Unknown said…
@ पियू - छे ग. पुलन्च्याचाच वार्यावरची वरात मधले 'बाजीप्रभू देशपांडे . . अन अ निस्त्येच देशपांडे' या चालीवर मी तुझ्या कमेंट ला उत्तर देईन. :)

ब्लॉग वर स्वागत! :)
Unknown said…
@ स्पंदन -
अनुमोदन. ती मजा वेगळीच. त्याच्या वर स्वतंत्र लेख येऊ शकतो. :D

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क